जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व

 दरवर्षी जगभरात २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. २००९ मध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने मंजूर केलेल्या ठरावानुसार हा दिवस इंटरनॅशनल मदर अर्थ डे  (https://www.unep.org/events/un-day/international-mother-earth-day-2025) म्हणून घोषित करण्यात आला. ही पृथ्वी म्हणजे आपले एकमेव घर आहे, मात्र आता पृथ्वी गंभीर पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जात आहे ज्याची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे ही आठवण करून देणारा हा एक महत्वाचा दिवस आहे.

आपली सुंदर पृथ्वी
कोणाला याचा अनुभव घेण्यासाठी खूप दूर जाण्याची गरज नाही आहे. हे सौंदर्य आपल्या भोवताली आहे. हिरवळ आणि झाडाने भरलेले डोंगर असो किंवा डोंगरावरून वाहणारे पाणी असो, रंगीबेरंगी फुले, घनदाट जंगल असो किंवा मुक्तपणे वाहणारी नदी आणि विविध परिसंस्था व समुद्री जीवनाने भरलेला अथांग समुद्र असो किंवा आपल्याला  ताजेतवाने  स्पर्श देणारी मोकळ्या हवेची झुळूक असो,हे सारे निसर्गाची प्रत्येक निर्मिती दर्शवते.  

पण त्याची आपण काय अवस्था केली आहे. . .
मनुष्य म्हणून आपण आश्चर्यकारक प्रगती केली असली तरी पर्यावरण आणि जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांबाबत आपण दुर्लक्ष केले आहे. हवामान बदल, उष्णतेच्या लाटा, वादळे, दूषित नद्या, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण अशा अनेक गोष्टी परिणाम स्वरूप आपल्या समोर आहेत. वस्तुस्थिती ही आहे कि आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या गोष्टीची दखल केवळ सरकार आणि संस्थांनी नव्हे तर प्रत्येकाने  वैयक्तिक स्तरावर आणि ते सुद्धा तातडीने घेणे गरजेचे आहे. परंतु सर्व चित्र नकारात्मक नाही, लोकांना पर्यावरणाप्रती त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. अनेक संस्था हरित तंत्रज्ञान (ग्रीन टेक) आणि अक्षय ऊर्जेचा अंगीकार करत आहेत. मात्र  आव्हाने ही वाढतच जात आहेत. आपण किती दूर आलो आहोत आणि या आव्हानांच्या बाबतीत आपण कुठे आहोत आणि नेमके काय केले पाहिजे यावर विचार करण्याची वेळ आली आहे. या आव्हानांचा परिणाम कुठेतरी दूरवर नाही तर आपल्या प्रत्येकाला दैनंदिन जीवनात दिसून येत आहेत.  जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असणाऱ्या सर्वांवर याचा परिणाम होत आहे.

जग हे आपले सर्वांचे घर आहे

आपल्याकडे फक्त एकच पृथ्वी आहे आणि जग आपले घर आहे.  आपल्याला आपले जग या अशा आव्हानांनी भरलेले हवे आहे की, सौंदर्याने नटलेले  शांत व स्थिर वास्तव असलेले हवे.  

तत्पर कृती, दीर्घकालीन ध्येय

पर्यावरणाच्या बाबतीत  निष्क्रियतेचा परिणाम आपण सर्व भोगत आहोत.संदेश स्पष्ट आहे - तत्पर कृती आणि शाश्वततेचे दीर्घकालीन ध्येय हा पर्याय नसून आपल्या अस्तिस्त्वासाठी आणि वसुंधरेसाठी गरजेची बाब आहे. यासाठी सरकार, संस्था आणि वैयक्तिक या सर्व पातळीवर बहुआयामी दृष्टीकोनाची गरज आहे. बदल घडवण्यासाठी कोणी पर्यावरण तज्ञ असण्याची गरज नसते. आपण आपल्या घरातून सुरवात करून, सवयी बदलून, बदल घडवू शकतो.
आपण करू शकू अशा काही सोप्या गोष्टी...

    घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करणे
    स्वयंपाक घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती
    प्लास्टिकचा वापर कमी करा आणि पर्यावरणपूरक गोष्टींना समर्थन द्या.
    स्थानिक स्वच्छता आणि वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घ्या.
    शक्य असल्यास चालणे, सायकल चालवणे, सार्वजनिक परिवहनाचा वापर करा.
    हरित ऊर्जेचा वापर करा.
    काय करणे गरजेचे आहे याबरोबरच सामूहिक कार्याच्या शक्तीबद्दल जागरूकता निर्माण करा.
     ई-कचऱ्याची विल्हेवाट अधिकृत सेवा प्रदात्याच्या माध्यमातून करा.  
    कोणत्याही प्रकारचा कचरा जाळणे टाळा.

सामूहिक कार्य बदल घडवू शकते

एकीकडे जगभरातील विविध देश एकत्र येऊन हवामानातील बदल कमी करण्याचा प्रयत्न करत असतील तरी सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन केलेल्या कामाची ताकद आहे जी लक्षणीय बदल घडवू शकते. आपली संसाधने, ज्ञान, याच्या एकजुटीने आपले प्रयत्न जागतिक पातळीवर पोहोचतील. शेवटी जगच आपले घर आहे, त्याची काळजी आणखी कोण घेईल? 

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

प्रतिबंध आणि तत्परतेला चालना देणारी कार्यशाळा

Waste Segregation: A Global Challenge We Can No Longer Ignore