जागतिक पर्यावरण दिवस प्लास्टिक प्रदूषण - आपण परिस्थिती बदलू शकतो

किफायतशीर,वजनाने कमी,टिकाऊ आणि वापरण्यास सोपे या सर्व गोष्टींमुळे प्लास्टिक  हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकचा वापर जेव्हा चुकीच्या पध्दतीने केला जातो किंवा निष्काळजीपणाने त्याची विल्हेवाट लावली जाते,तेव्हा त्याचा नैसर्गिक परिसंस्था,वन्यजीव,समुद्र आणि अगदी मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

जागतिक पर्यावरण दिवस हा दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो आणि या दिनानिमित्त चांगल्या भविष्यासाठी शाश्वत पध्दतींचा अवलंब याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण केली जाते.यावर्षीची संकल्पना एंडिंग प्लास्टिक पोल्युशन म्हणजे प्लास्टिक प्रदूषण थांबवूया ही आहे.

युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्राम (युएनईपी) च्या अंदाजानुसार दरवर्षी 19 ते 23 दशलक्ष टन प्लॅस्टिक कचरा हा नद्या,तलाव,समुद्र अशा जलीय परिसंस्थांमध्ये जातो.

प्लास्टिकबाबतची मुख्य समस्या ही आहे की,इतर नैसर्गिक पदार्थांप्रमाणे ते जैविकरित्या विघटित होत नाही.त्याऐवजी सूक्ष्म प्लास्टिक घटकांमध्ये (मायक्रोप्लॅस्टिक) तुकडे पडतात आणि शेकडो वर्षे वातावरणात टिकून राहू शकतात.स्ट्रॉ,पिशव्या आणि फूड पॅकेजिंग यासारखे सिंगल यूज प्लॅस्टिक विशेष करून त्रासदायक असतात.त्यांचा वापर काही मिनिटांकरिता होतो,परंतु ते शेकडो वर्षे निसर्गात राहतात.या सर्व गोष्टींमुळे प्लास्टिक प्रदूषण ही एक मोठी जागतिक समस्या बनली असून त्याचे व्यापक परिणाम दिसून येत आहेत.

विविध देशांमधील सरकार,उद्योग हे अभिनवता आणि शाश्वत पध्दतींद्वारे नेतृत्व करू शकतात.परंतु आपण सर्व वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणावर बदल घडवू शकतो.आपल्या दैनंदिन आयुष्यात काही छोटे बदल करून मोठ्या प्रमाणावर बदल करू शकतो.आता हे छोटे बदल जरी सुरूवातीला थोडे अवघड वाटले तरी कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी ते आवश्यक आहेत.

रिड्युस,रियूज व रिसायकल (थ्री आर) : जरी पुर्नवापराचा फायदा होत असला तरी तो संपूर्ण उपाय नाही.कारण वस्तुस्थिती ही आहे की,प्लास्टिक कचऱ्याच्या मोठ्या भागाचा परिणामकारकरित्या पुर्नवापर अजूनही होत नाही.त्यामुळे सर्वात प्रभावी कृती म्हणजे प्लास्टिकचा वापर लक्षणीयरित्या कमी करणे.खरेदीला जाताना पुर्नवापर करण्यायोग्य किंवा कापडी पिशव्या घेऊन जाणे,बाहेरील खाद्यपदार्थ पार्सल आणताना स्वत:चा डबा घेऊन जाणे आणि एकदाच वापरता येणारे स्ट्रॉ टाळणे हे योग्य ठरेल.जिथे जिथे शक्य आहे,तिथे पर्यावरणपूरक किंवा शाश्वत पॅकेजिंग असलेली उत्पादने निवडा.

कचऱ्याचे योग्य वर्गीकरण : घरी सुका व ओला कचरा वेगळा करून योग्य पध्दतीने त्याची विल्हेवाट लावा.योग्य वर्गीकरण केल्यास पुर्नवापर करता येणारा कचरा निरूपयोगी होऊन उघड्यावर टाकला जाणार नाही.

स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा : स्वच्छता मोहिमा व जागरूकता मोहिमांमध्ये भाग घ्या.एकत्रित आणि सहयोगाने काम केल्यामुळे त्या कामाला गती निर्माण होते,जागरूकता वाढते आणि सकारात्मक व्यापक परिणाम दिसून येतात.

प्लास्टिक  ऐवजी कापड,काचेच्या वस्तू किंवा जैवविघटन होऊ शकेल अशी उत्पादने वापरल्यास प्लास्टिकची मागणी कमी होईल आणि स्त्रोतापासूनच प्रदूषण कमी होईल.सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण वैयक्तिकरित्या या बदलामध्ये उत्प्रेरक ठरू शकतो.याची जागरूकता वाढवून,पर्यावरणपूरक व्यवसायांना पाठिंबा देऊन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रभावी धोरणांचा आग्रह धरून आपण सर्व मिळून सकारात्मक परिणाम निर्माण करू शकतो,यात शंका नाही.

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

प्रतिबंध आणि तत्परतेला चालना देणारी कार्यशाळा

Waste Segregation: A Global Challenge We Can No Longer Ignore