कचरा व्यवस्थापनाची कार्यसंस्कृती घडवण्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी
शाश्वत भविष्यासाठी केवळ धोरणे आणि तंत्रज्ञान पुरेसे नाही,तर त्यासाठी व्यक्तीगत पातळीवरून सुरू होणारा बदल आवश्यक आहे. हाच महत्त्वाचा संदेश अधोरेखित करत स्मार्ट एन्व्हायरो सिस्टिम्स प्रा.लि.चे संस्थापक संदीप कानेटकर यांनी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या क्लीन सिटी टॉक्स या उपक्रमात तरूणांशी संवाद साधला. विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेत नेतृत्व आणि शाश्वततेचा वेध घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
इंटर्नशिपसाठी कचरा व्यवस्थापन क्षेत्र निवडणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी बोलताना कानेटकर यांनी योग्य कचरा व्यवस्थापनाची कार्यसंस्कृती विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरूवात ही वैयक्तिक जबाबदारीतून होते आणि विशेषत: लहान वयात,शाळांमधून रूजवली गेली पाहिजे,असे त्यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनाचे विविध पैलू,सेंद्रिय कचऱ्याच्या व्यवस्थापनातील आव्हाने याबाबत त्यांनी सादरीकरण केले.
या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही कचरा व्यवस्थापन व्यवस्थेचा कणा असलेल्या स्वच्छता सैनिकांंप्रती सन्मान व प्रतिष्ठा राखण्याचे महत्त्व. या स्वच्छता सैनिकांंच्या योगदानामुळेच सर्वसमोवशक व प्रभावी शाश्वत परिसंस्था निर्माण होऊ शकते,असे कानेटकर यांनी नमूद केले.
याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर,मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे आणि लीड वॉलेंटियर सत्या नटराजन आदी मान्यवर उपस्थित होते.
क्लीन सिटी टॉक्स हे संवाद,शिक्षण आणि प्रेरणेसाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून सातत्याने कार्यरत असून, स्वच्छ व अधिक शाश्वत शहरांची जबाबदारी पुढील पिढीने स्वीकारावी यासाठी हा उपक्रम प्रेरणा देत आहे.
